
कोपरगाव : महाराष्ट्र शासनामार्फत मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान राबविण्यात येत असून या अभियानांतर्गत कोपरगाव तालुक्यातील 75 ग्रामपंचायतींचा समावेश करण्यात आला आहे. देशाचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र जी मोदी साहेब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून या अभियानास दि.१७ सप्टेंबर २०२५ पासून प्रभावीपणे सुरुवात होणार आहे सदर अभियान दि. ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत चालणार आहे. या अभियानाचे मुल्यांकन जानेवारीमध्ये होऊन भरघोस बक्षीस दिली जाणार आहे. अशी माहिती मा. श्री. संदिप दळवी कोपरगाव गटविकास अधिकारी यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.

या अभियाना दरम्यान १)सुशासन युक्त पंचायत तयार करणे. २) ग्रामपंचायत आर्थिक दृष्ट्या सक्षम करणे. ३) गावे जलसमृद्ध स्वच्छ व हरित करणे. ४) मनरेगा व इतर योजनांचे अभिसरण करणे. ५) गाव पातळीवरील संस्था सक्षम करणे.
६) उपजीविका विकास करणे व सामाजिक न्याय देणे.७)लोकसहभाग व श्रमदानाच्या माध्यमातून लोक चळवळ निर्माण करणे यावर विशेष भर देण्यात येणार आहे.
पुढे श्री. दळवी म्हणाले कि, याबाबत प्रशासनामार्फत प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर नियोजन करण्यात येत असून, अधिकारी व कर्मचारी यांच्या सक्रिय सहभागातून हे अभियान प्रभावीपणे राबविण्याची तयारी पूर्ण झाली आहे. यामध्ये स्थानिक ग्रामस्थ, स्वयंसेवी संस्था व सामाजिक कार्यकर्त्यांचा सहभाग मिळवून “आदर्श ग्रामपंचायत” घडविण्याचा संकल्प या अभियानातून करण्यात येत आहे. मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाची अंमलबजावणी व सनियंत्रण ग्रामविकास व पंचायतराज विभागाचे मंत्री माननीय श्री. जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती करणार आहे.
यात जिल्हास्तरावर माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी तर तालुकास्तरावर माननीय गटविकास अधिकारी हे मूल्यमापन समितीचे अध्यक्ष म्हणून काम पाहतील व उत्कृष्ठ ग्रामपंचायतींची प्रथम, द्वितीय व तृतीय पुरस्कारसाठी निवड करतील.
पुरस्काराची रक्कम
तालुकास्तर प्रथम १५ लक्ष रुपये, द्वितीय १२ लक्ष रुपये, तृतीय ८ लक्ष रुपये.
जिल्हास्तर प्रथम ५० लक्ष रुपये, द्वितीय ३० लक्ष रूपये, तृतीय २० लक्ष रुपये.
विभागस्तर प्रथम १ कोटी रूपये, द्वितीय ८० लक्ष रूपये, तृतीय ६० लक्ष रूपये.
राज्यस्तर प्रथम ५ कोटी रुपये,द्वितीय ३ कोटी रूपये, तृतीय २ कोटी रुपये अशी भरघोस बक्षीस असणार आहे.यामध्ये जिल्हा परिषद व पंचायत समित्यांनाही बक्षीस असणार आहे.
पुढे,आपल्या जिल्ह्यामध्ये पालकमंत्री मा. नामदार श्री. राधाकृष्ण विखे साहेब व सभापती मा. नामदार श्री. राम शिंदे साहेब यांच्या उपस्थितीमध्ये जिल्हास्तरीय कार्यशाळा दि. ५ सप्टेंबर रोजी पार पडली आहे. मागच्या आठवडयात तालुक्याची कार्यशाळा सर्व ग्रामपंचायत सरपंच, सदस्य, कर्मचारी यांच्यासाठी आयोजित केली होती त्यास मुख्य कार्यकारी अधिकारी मा. श्री. गुंजाळ साहेब यांनी संबोधित केले होते.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या हस्ते या अभियानाचा उद्घाटन सोहळा दि. १७ सप्टेंबर रोजी सकाळी ठिक १० वाजता होणार आहे. तरी सर्व ७५ ग्रामपंचायतींनी या अभियानात सहभाग नोंदवावा असे आव्हान कोपरगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मा. श्री. संदिप दळवी साहेब यांनी पत्रकार परिषद दरम्यान केले आहे.