
कोपरगाव :- रयत शिक्षण संस्थेच्या श्री सद्गुरु गंगागीर महाराज सायन्स, गौतम आर्ट्स ॲण्ड संजीवनी कॉमर्स कॉलेज, कोपरगाव येथे ‘पंडित दीनदयाल उपाध्याय’ यांच्या हीरक महोत्सवी जयंतीनिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांमध्ये महान विचारवंत पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या विचारांचे बीज रोवण्यासाठी आणि त्यांना बोलतं करण्यासाठी हा कार्यक्रम घेण्यात आला.
सदर कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमा पूजनाने झाली. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मा.श्री.विजय जोशी, मा. श्री. रामदास खरे आणि मा. श्री वाणी हे लाभले. कार्यक्रमाचे अध्यक्षपद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव सरोदे यांनी भूषविले.
प्रमुख पाहुणे मा. श्री.विजय जोशी यांनी आपल्या मनोगतात,“ समाजाशी नाळ जोडली जावी आणि सर्वांना समान दर्जा, समान वागणूक मिळावी हा उद्देश ठेवून पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी कार्य केले आहे. माझा देश, माझी माणसे जोपर्यंत सर्वदृष्ट्या संपन्न होत नाही, तोपर्यंत मी कार्य करत राहील. अशी त्यांची प्रतिज्ञा होती.” असे त्यांनी यावेळी सांगितले.
मा. श्री. रामदास खरे यांनी, “महाराष्ट्रातील गरीब समाज शिक्षणापासून वंचित होता ही शैक्षणिक गरज ओळखून महाराष्ट्राला साक्षर करण्याचे काम ज्याप्रमाणे कर्मवीर भाऊराव पाटील यांनी केले त्यांच्याच बरोबरीने हे कार्य देशभरात पंडित दीनदयाळ यांनी केले आहे, त्याचबरोबर एकात्म मानवताचे सूत्रही उलगडून दाखवले.
अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ.माधव सरोदे यांनी,“स्वतःसाठी न शिकता समाजासाठी शिका आणि नोकरीसाठी न शिकता समाज उद्धारासाठी शिका असा संदेश यावेळी दिला. त्याचबरोबर पंडित दीनदयाळ शर्मा उपाध्याय यांचे जीवन चरित्र लोकांना समजावे हा या कार्यक्रमामागील उद्देश आहे. हे सांगितले.”
कार्यक्रमाचे प्रास्ताविक, स्वागत व परिचय डॉ. एम. आर. यशवंत यांनी करुन दिला,तर सदर कार्यक्रमासाठी विविध महाविद्यालयातील स्पर्धक, त्यांचे मार्गदर्शक आणि महाविद्यालयातील प्राध्यापक आणि विद्यार्थी मोठ्याप्रमाणात उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आभार डॉ. सी. बी. चौधरी यांनी मानले, तर सूत्रसंचालन डॉ. भागवत देवकाते यांनी केले.