
कोपरगाव : – संत ज्ञानेश्वर महाराजांच्या सप्तशतकोत्तर सुवर्णमहोत्सवी जन्मोत्सवानिमित्त श्री संत सावता साहित्य परिषद, महाराष्ट्र राज्य संघटनेच्यावतीने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला.
श्री संत सावता साहित्य परिषदेचे अध्यक्ष विशाल महाराज गडगे यांनी सांगितले की, “संतांचे चरित्र, विचार, कार्य काव्याद्वारे समाजापर्यंत पोहोचविणे, नवी पिढी संस्कारक्षम करणे, सृजनशीलतेकडे वळविणे तसेच राज्यभरातील साहित्यिक व साहित्यप्रेमींना एकत्र आणणे हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश होता.”
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातूनच नव्हे तर परदेशातून देखील नवोदित कवींपासून ते अनुभवी साहित्यिकांपर्यंत सर्व वयोगटातील ४५० कवींनी सहभाग नोंदवला. प्राप्त रचनांमध्ये भक्तिप्रधान ओव्या, गझल, मुक्तछंद, अभंग,द्वीपदी अशा काव्यप्रकारांचे वैविध्य पाहवयास मिळाले.
प्राप्त काव्यरचनांचे परीक्षण ज्येष्ठ कवी व समीक्षक प्रा. विजय लोंढे व स्पर्धेचे समन्वयक कविवर्य संदीप वाघोले यांनी केले. मौलिकता, विषय सुसंगती, आशय संपन्नता , प्रबोधनभाव या निकषांवर आधारित रचनांचे परीक्षण करून स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे जाहीर करण्यात आला.
प्रथम क्रमांक – प्रदीप देशमुख, चंद्रपूर
द्वितीय क्रमांक – सौ क्रांती राणे पाटील, सातारा.
तृतीय क्रमांक – डॉ संजय गायकवाड, छत्रपती संभाजीनगर.
उत्तेजनार्थ क्रमांक- १)साहेबराव घुले, अहिल्यानगर
२)सौ अपर्णा अजय कुळकर्णी, नागपूर
३) सीताराम नरके, पुणे.
सदरच्या स्पर्धेत कोपरगाव येथील कवयित्री, माजी नगराध्यक्षा सौ. ऐश्वर्यलक्षमी सातभाई, सौ. शैलजा रोहोम, कवि सोमनाथ मंडाळकर, छायाचित्रकार साहित्यिक हेमचंद्र भवर यांनी सहभाग घेतला होता. स्पर्धा यशस्वीतेसाठी श्री संत सावता माळी युवक संघाच्या महिलाध्यक्षा अनुराधाताई गडगे, जुन्नर तालुका अध्यक्ष संजयशेठ लक्ष्मण शिंदे यांनी विशेष परिश्रम घेतले.