
कोपरगाव :- “आजच्या विद्यार्थ्यांनी आणि तरुण पिढीने सावित्रीबाईंच्या विचारांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून शिक्षणाला सामाजिक परिवर्तनाचे साधन मानले पाहिजे. शिक्षण केवळ नोकरीसाठी नव्हे, तर समाजात सकारात्मक बदल घडविण्यासाठी असावे, हीच त्यांची खरी शिकवण आहे.अशा प्रेरणादायी विचारवंताची जयंती साजरी करून महाविद्यालयाने सामाजिक बांधिलकी जपली आहे. आयोजकांचे मी मनापासून अभिनंदन करतो व सर्व उपस्थितांना सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचे आवाहन करतो.” असे प्रतिपादन उच्च न्यायालय मुंबई येथील न्यायमूर्ती व एस. एस. जी. एम. महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी मा. श्री. आबासाहेब शिंदे यांनी केले. ते रयत शिक्षण संस्थेच्या श्री सद्गुरु गंगागीर महाराज विज्ञान, गौतम आर्ट्स ॲन्ड संजीवनी कॉमर्स कॉलेज, कोपरगाव येथील महिला मंच, अंतर्गत तक्रार समिती, तक्रार निवारण समिती, सांस्कृतिक विभाग आणि अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्त विशेष व्याख्यानात बोलत होते.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य व महाविद्यालय विकास समितीचे सदस्य ॲड संदीप वर्पे यांनी भूषविले.
अध्यक्षीय भाषणात ॲड. संदीप वर्पे यांनी, “आज क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणे अत्यंत आवश्यक आहे. कारण तत्कालीन समाजात प्रचलित असलेल्या विविध सामाजिक परंपरांमुळे स्त्री-पुरुष समानतेचा अभाव होता. केशवपन, स्त्री भ्रूणहत्या यांसारख्या गंभीर सामाजिक समस्यांची तीव्रता त्या काळात अधिक प्रकर्षाने दिसून येत होती. अशा प्रतिकूल परिस्थितीत सावित्रीबाई फुले यांनी समाज जागृतीचे कार्य केले,” असे प्रतिपादन केले.
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त उपस्थित पाहुण्यांचा परिचय व कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव सरोदे यांनी, सावित्रीबाई फुले यांच्या शैक्षणिक, सामाजिक व स्त्री-मुक्तीच्या कार्यावर प्रकाश टाकत, त्यांच्या विचारांची आजच्या काळातील उपयुक्तता विशद केली. सदर कार्यक्रमप्रसंगी कै. सौ. सुशीलाबाई शंकरराव काळे ऊर्फ माई यांच्या स्मरणार्थ आयोजित आंतरमहाविद्यालयीन राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला. तसेच रयत शिक्षण संस्थेचे व्हा . चेअरमन आणि महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन ॲड.भगीरथ शिंदे यांनी दूरदृश्य प्रणाली द्वारे कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमास मा. श्री. सुनील जगताप, महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष श्री. वसंतराव देशमुख, सौ. मनिषा शिंदे, श्री. हिरालाल शिंदे, शिंदे कुटुंबीय, कला शाखेचे उपप्राचार्य डॉ. बंडेराव तऱ्हाळ, विज्ञान शाखेचे उपप्राचार्य डॉ. घनश्याम भगत, वाणिज्य शाखेचे उपप्राचार्य डॉ. अर्जुन भागवत, मा. श्री. नारायण शिंदे, अंतर्गत तक्रार निवारण समितीच्या डॉ. सीमा दाभाडे, कार्यालय अधीक्षक श्री. सुनील गोसावी यांच्यासह प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. भागवत देवकाते यांनी केले, तर आभार प्रदर्शन महिला मंचाचे डॉ. उज्वला भोर यांनी व्यक्त केले.