
संपादक -राजेंद्र तासकर
कोपरगाव शहरातील विस्थापित अतिक्रमणधारकांना पालिका प्रशासनाने कायम स्वरूपी पर्यायी जागा उपलब्ध करून देऊन त्यांचे पुनर्वसन करावे या मागणीचे निवेदन सर्वपक्षीय संघर्ष समितीच्या वतीने मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांना बुधवारी देण्यात आले.
या निवेदनात पुढे म्हटले आहे की,गेल्या तीन-चार पिढयापासुन शहरातील विविध ठिकाणी रस्त्यांलगत छोटे व्यवसाय उभारून आपल्या कुटूंबांचा उदरनिर्वाह शेकडो नागरिक करित आहेत.या अगोदर १० मार्च २०११ रोजी अतिक्रमणाची मोहिम राबवुन अनेक व्यवसायीकांना विस्थापीत केले होते,सद्यस्थितीत त्यातील काही व्यवसायीक कोपरगांव सोडून बाहेरगांवी निघुन गेलेले आहे. त्यातील काही ठराविक व्यवसायीक आपला व्यवसाय करीत होते.ऐन गुढीपाडव्याच्या अगोदर नगरपरिषदेने २३ मार्च २०२२ मध्ये विविध भागातील अतिक्रमण अचानक काढण्याची कारवाई राबविली.त्यात अनेक कुटूंब विस्थापीत झालेले आहेत. त्यामुळे मानवी मुल्यांचा विचार करता आपल्या कुटूंबियांना एक वेळचे जेवण मिळावे यासाठी काही व्यवसायीकांनी रहदारीस अडथळा होणार नाही याची काळजी घेत आपले व्यवसाय कर्ज बाजारी होवुन पुन्हा उभे केले होते.मात्र त्यांच्या रोजी रोटीवर पुन्हा अतिक्रमण नावाचा वरवंटा फिरवला जाण्याची भिती निर्माण झालेली आहे.
तरी या लहान व्यवसायीकांचा जीवन जगणे मुश्कील होणार नाही ही जाणीव ठेवत प्रशासनाने त्यांना पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी. या निवेदनावर सर्वश्री निलेश बाबुराव काकडे,अकबर शेख, रविंद्र पाठक,विजय गोरखनाथ आढाव,विनोद राक्षे,सुशांत खैरे, किरण सुपेकर,कैलास येवले, दिपक पाठक,अमोल जावरे, निसार शेख,प्रकाश रेठे यांच्या स्वाक्षर्या आहेत.