
कोपरगांव : – मायेची ममता सर्वांना समजते पण बाप किती हालअपेष्टात जीवन जगतो त्याची कुणी कदर करत नाही, जगात मुलगी आणि बाप यांचे नाते अत्यंत भावनीक आहे. बाप कुटूंबासाठी अहोरात्र झिजतो पण तो गेल्यावर त्याची आपल्याला किंमत कळते. कथा-कीर्तनातुन माय-बापाची महती सांगितली जाते त्यावर प्रत्येकांने जाणिवपुर्वक विचार करून वडीलांना तुम्ही बरे आहात का एव्हढेच विचारा हिच त्या पित्याची पाल्याकडुन माफक अपेक्षा असते असे प्रतिपादन हरिद्वार येथील आचार्य शिरीष महाराज बारी यांनी केले. येथील तहसील कार्यालयाच्या मैदानावर साईगांव पालखी सोहळयानिमीत्त नवनाथ भक्ती कथेचे सहावे पुष्प गुंफतांना ते बोलत होते.
प्रारंभी श्री साईबाबा संस्थान शिर्डीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्षनाथ गाडीलकर यांनी मुंबादेवी तरूण मंडळाच्यावतीने आयोजित केलेल्या साईगांव पालखी सोहळयाचे कौतुक करत गेल्या ३२ वर्षापासुन साईनामाचा जप अव्यहतपणे या भुमित केला जातो त्याचा संस्थानच्यावतीने स्विकार करून सर्वांनी रामनवमीनिमीत्त साईदर्शनासाठी गडबड गोंधळ न करता सबुरी ठेवावी असे ते म्हणाले. सर्व समस्यांचे मुळ अहंकारात आहे तेंव्हा अहंकाराला दुर ठेवावे ही शिकवण साईबाबांनी देत श्रध्दा सबुरीचा मंत्र दिला आहे तो प्रत्येकांने अंगीकारावा त्यातुन सर्वांचे जीवनांत आनंद निर्माण होईल असेही ते शेवटी म्हणाले.
आचार्य शिरीष महाराज बारी पुढे म्हणाले की, प्रपंचात मोह माया आहे. त्याचा त्याग करून भगवंत भक्तीत सर्वांनी लिन व्हावे. गेल्या १३ वर्षापासुन आपण देश विदेशात विविध कथांचे निरूपण केले पण पैशापेक्षा माणसं जास्त कमावली आहे. प्रत्येकाने भगवंताकडे आपल्या आई- वडीलांसाठी चांगले आरोग्य मागावे. बाप आपली सुख-दुःखे बाजुला ठेवुन मुला मुलींचे प्रत्येक लाड पुर्ण करण्याचा सतत प्रयत्न करतो. नवनाथ कथासार जीवनात मार्गदर्शकाचा मुख्य दिवा आहे, तो भक्तीच्या रूपातुन प्रत्येकांने तेवत ठेवावा, त्यातच आयुष्याचा मुलमंत्र दडलेला आहे असे सांगुन त्यांनी भावनिक पध्दतींने सादर केलेल्या बाप नावाचं पान आयुष्यात फाटतच नाही या कवितेतुन सर्व साईभक्तांचे डोळे पाणावले.
साईगांव पालखीत साईच्या दर्शनासाठी कोपरगावांतुन पायी जाणा-या भक्तांसाठी संजीवनी व कोसाका उद्योग समुहाने परतीच्या प्रवासासाठी ५० बसची विनामुल्य व्यवस्था केली असुन राज्य पतसंस्था फेडरेशनचे काका कोयटे यांनीही वयोवृध्द महिलांसाठी मोफत बससेवा उपलब्ध करून दिली आहे. एप्रिल महिन्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्यावतीने तहसील कार्यालय मैदानावर कोपरगांव येथेराज्यस्तरीय हिंदु धर्म संमेलनाचे आयोजन करण्यांत आले असुन त्यात प्रत्येकाने सहभाग नोंदवावा असे आवाहन मुंबादेवी तरूण मंडळाच्यावतीने करण्यांत आले. विमलताई मधुकर कोठावदे, रंजना अरूण पाखले (चाळीसगांव), सुनिता राहुल हलवाई या तीन भाग्यवान साईभक्तांना चांदीची साईमुद्रा देण्यांत आली.
संपुर्ण कथा सप्ताह काळात अनेक महिलांनी घरूनच आरतीचे ताट सजवुन आणले होते, तर काही महिलांनी तुळस, रंगनाथ स्वरूपातील कृष्ण भगवान देखण्या रूपात सजवुन डोईवर घेत फेर धरला, लहान मुला-मुलींसह महिलांनी टिप-यांच्या तालावर नाचत कथेचा मनसोक्त आनंद घेतला तर पुरूष भाविक फुगडया धरून नाचले, शिस्तबध्द नियोजन आणि सुस्पष्ट आवाज, वयोवृद्धांना बसण्यासाठी खुर्च्यांची व्यवस्था, यामुळे संपुर्ण कथेत कुठेच व्यत्यय आला नाही., ज्या साई भक्तांना थेट उपस्थित राहता आले नाही त्यांनी फेसबुकच्या माध्यमातून ही कथा प्रत्यक्ष ऐकली. राष्ट्रसंत जनार्दन स्वामी आश्रमाचे मठाधिपती रमेशगिरी महाराज यांनी नवनाथ भक्तांना आपल्या वाणीने कथेतील काही भाग समजावून सांगितला., आयुष्यात कलियुगात भरकटलेल्यांना आध्यात्मिक कथा योग्य मार्ग दाखवतात.