
कोपरगांव :- कोपरगांव नगरपालिका पाच टक्के शेष निधीतुन दिव्यांगांना त्यांच्या वर्गवारीनुसार अर्थसहाय्य देते ते सरसकट पाच हजार रूपये करावे या मागणीचे निवेदन कोपरगांव शहर भारतीय जनता पार्टी दिव्यांग सेलचे कोपरगांव तालुका भाजपा दिव्यांग सेलचे अध्यक्ष मुकुंद काळे यांनी पंचायत समिती कोपरगांवचे गटविकास अधिकारी यांना नुकतेच दिले आहे. तर शहराध्यक्ष स्वप्नील हरिश्चंद्र कडु यांनीही मुख्याधिकारी यांनाही याच मागणीचे निवेदन दिले आहे.

त्यांनी आपल्या निवेदनांत पुढे म्हटले आहे की, राज्य सहकारी साखर संघाचे संचालक व युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांनी दिव्यांगांच्या शेष निधीची रक्कम वाढवुन मिळावी म्हणून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व दिव्यांग विभागाकडे मागणी केली आहे कि,सध्या पालिकेच्या ५ टक्के शेष निधीतुन ४० टक्के दिव्यांग बांधवांसाठी २ हजार पाचशे, ६० टक्के दिव्यांग बांधवासाठी ३ हजार रूपये, तर ८० टक्के दिव्यांग बांधवांसाठी ३ हजार पाचशे रूपये अर्थसहाय वितरीत केले जाते. ग्रामिण भागातही याच पध्दतीने वाटप होते मात्र सध्याची वाढती महागाई विचारात घेता दिव्यांग बांधवांना या तुटपुंज्या रक्कमेत वैद्यकिय उपचार घेणेही मुश्किल होत आहे. त्यांची ओढताण होते तेंव्हा यासाठी सरसकट पाच हजार रूपये अर्थसहाय वितरीत केले जावे त्याचप्रमाणे कोपरगांव पालिकेच्यावतीने अशा प्रकारचे अर्थसहाय वाटप करण्यापुर्वी शहरात स्वतंत्र भोंगा फिरवुन या योजनेची माहिती द्यावी जेणेकरून पात्र दिव्यांगांना त्याचा लाभ घेता येईल.
याप्रसंगी दिव्यांग सेलचे उपाध्यक्ष मुख्तार पठाण, मार्गदर्शक सहायक योगेश नेमीचंद गंगवाल, कोपरगांव तालुका दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष व माजी नगरसेवक जयवंत सहादु मरसाळे, आदि दिव्यांग बांधव उपस्थित होते.