
संपादक – राजेंद्र तासकर
कोपरगाव,
आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच अमावास्येला आषाढी अमावास्या किंवा दीप अमावास्या असे म्हणतात.श्रावणाचा पवित्र महिना सुरु होण्याच्या आदल्या दिवशी ही अमावास्या येत असल्याने घरातील दिव्यांची पूजा केली जाते.श्रावण महिन्यात वेगवेगळ्या सणांसाठी वापरल्या जाणाऱ्या दिव्यांची हा महिना सुरु होण्याआधीच पूजा करण्याचा हा सणआहे.त्यानिमित्त माध्यमिक लोकशिक्षण मंडळाचे सचिव राजेश गडाख यांच्या मार्गदर्शनातून सुरू असलेल्या सिन्नर भूषण सूर्यभानजी गडाख प्राथमिक विद्यालय पंचाळे येथे दीप अमावास्या निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
लहान मुले ही वंशाचा दिवा असल्याचं मानलं जातं म्हणून त्यांना ओवाळण्याची प्रथा आहे. कार्यक्रम प्रसंगी चिमूरड्यांचे पूजन करून शुभंकरोती ही प्रार्थना म्हणत लहान मुलांना ओवाळण्यात आले.हिंदू संस्कृतीमध्ये दिव्याला फार महत्वाचं स्थान असून इडापिडा टळावी,अज्ञानाचा अंधकार दूर व्हावा आणि दिवा प्रकाश देतो तसा ज्ञानाचा प्रकाश सर्वांच्या आयुष्यात पडावा या प्रार्थनेसहीत उपस्थित सर्व शिक्षक वृंद मान्यवरांनी दिव्यांची मनोभावे पूजा करत दीप अमावास्येचे महत्त्व मुलांना समजावून सांगितले.
माध्यमिक लोक शिक्षण मंडळाच्या “जनी ज्ञानदीप लावू ” या ब्रीदवाक्या प्रमाणे रांगोळी व दिव्यांच्या सुंदर आराशीत विद्यार्थ्यांना प्रतीक म्हणून दाखवण्यात आले.
कार्यक्रम प्रसंगी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका शांताबाई शिंदे, ज्येष्ठ मार्गदर्शक शिक्षक आर.एस.गडाख,विश्वनाथ शिरोळे,राधाकिसन कहांडळ, विलास पवार,प्रवीण शेलार, प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक नवनाथ थोरात, मयुरी हिवरडे,नलिनी लोखंडे, शितल नाजगड,अंजली डुंबरे, पुजा जाधव,विनायक पवार, अमोल व्यवहारे,लता बेलोटे, संपत गडाख आदि शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी -विद्यार्थीनी यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला.