
मुख्य संपादक -राजेंद्र तासकर
दोन वेळा शिवसेना पक्षाकडून शिर्डी लोकसभा मतदारसंघातून मोठ्या मताधिक्याने दिल्लीला निवडून गेलेले व सध्या शिंदे गटाचे खासदार असलेले सदाशिव लोखंडे यांना कोपरगाव तालुक्यातील जनतेचे काहीच देणे घेणे उरले नाही का?असा सवाल कोपरगाव पंचायत समितीचे माजी सभापती सुनील देवकर यांनी उपस्थित केला आहे.
गेल्या आठ दिवसापासून परतीच्या पावसाने सबंध कोपरगाव तालुक्यात मोठा धुमाकूळ घातला असून शेतकऱ्यांनी काबाड कष्ट करत पदर मोड करत,कर्ज काढून शेतात मका, सोयाबीन,बाजरी आदि पिकांची पेरणी केली होती परंतु गेल्या आठ दिवसा पासून सुरू असलेल्या पावसाने सर्व पिके जमीन उद्ध्वस्त करत शेतकऱ्यांच्या तोंडचा घास पळविला असताना यात भर म्हणून की काय बुधवारी मध्यरात्री पुन्हा एकदा संपूर्ण तालुक्यात मोठ्या प्रमाणात ढगफुटी सदृश्य पाऊस होऊन उरली सुरली पिके देखील वाहून गेल्याने शेतकरी मोठा संकटात सापडला आहे तर दुसरीकडे याच पावसाने कोपरगाव शहरातील बहुतांश उपनगरात अनेकांच्या घरात २ ते ४ फूट पाणी घुसून संसार उपयोगी वस्तूंचा सर्वनाश झाला तर अनेकांनी आपल्या चिमुकल्यासह संपूर्ण रात्र जीव मुठीत धरून पाण्यात काढली तर शहरातील खंदकनाला व गोकुळ नगरी पुलावरून पाणी वाहत असल्याने शहरात देखील पूर परिस्थिती निर्माण झाली होती तर अनेक व्यापाऱ्यांच्या दुकानात पाणी शिरल्याने त्यांचे देखील मोठे नुकसान झाले आहे तर शेतकऱ्यांनी व व्यापाऱ्यांनी चाळीत साठवून ठेवलेला लाखो रुपयांचा कांदा देखील पाण्यात पोहताना दिसून येत आहे.
ऐन दिवाळीच्या तोंडावर पावसाने आपल्या रौद्र अवताराने सर्वकाही नेस्तनाबूत केल्याने शेतकऱ्यांसह शेतमजुरांना देखील दिवाळी सण साजरा करणे अवघड होऊन बसले आहेत तर व्यापाऱ्यांनी लाखो रुपयांचा माल खरेदी करत आपली सजवलेली दुकानं ग्राहक नसल्याने ओस पडल्याने सर्वत्र शुकशुकाट असताना शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सदाशिव लोखंडे यांना या भयावह परिस्थितीची पाहणी करायला देखील वेळ मिळत नसल्याने ही मोठी शोकांतिकाच म्हणावी लागेल असे मत देवकर यांनी व्यक्त करत खासदार लोखंडेंना कोपरगाव तालुक्याचे काही देणेघेणे नाही का?असा सवाल माजी सभापती देवकर यांनी उपस्थित केला आहे.