
मुख्य संपादक – राजेंद्र तासकर
कोपरगाव :- रयत शिक्षण संस्थेच्या श्री सद्गुरू गंगागीर महाराज सायन्स, गौतम आर्ट्स अँड संजीवनी कॉमर्स कॉलेज कोपरगाव येथे महानुभाव संप्रदायाचे प्रवर्तक सर्वज्ञ ‘श्री चक्रधर स्वामींचा ८०२ वा अवतार दिन कार्यक्रम’ मराठी विभागाच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प.पू.प. महंत श्री डॉ.यशराज महानुभाव हे होते तर, या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाच्या प्र.प्राचार्या डॉ. उज्वला भोर यांनी भूषविले.प्रमुख पाहुण्यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात ‘श्रीचक्रधर स्वामी यांनी जन्म, वर्ण, जात-पात स्त्री- पुरुष, श्रेष्ठ-कनिष्ठता नाकारून सर्वांना पंथात प्रवेश दिला.महानुभाव संप्रदायाचा आचार विचाराचा प्रसार व्हावा, वैराग्यशील धर्ममार्ग आणि सर्वाभूती प्रेमभाव यांना जोडणारी विचारसरणी असणारे श्री चक्रधर स्वामींनी आपल्या परिभ्रमणातून लोक जीवनाला आणि मराठी संस्कृतीला विशिष्ट आकार दिला विविध प्रकारात साहित्य निर्मिती केली,महानुभाव पंथाने मराठी भाषेचे वाङ्मय समृध्द केले. असे सांगून महानुभाव संप्रदायाच्या तत्वज्ञानाविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
याप्रसंगी ज्येष्ठ प्रा.डॉ.मोहन सांगळे यांनीही आपले विचार मांडले ते म्हणाले “महानुभाव पंथाने जाती निरपेक्षतेचा आणि अहिंसा तत्त्वज्ञानाचा पुरस्कार केला.श्री चक्रधर स्वामींनी महानुभाव संप्रदायाच्या तत्त्वज्ञानाचा प्रचार प्रसार केला.अहिंसा आणि कडकडीत वैराग्य यांचे पालन या संप्रदायाने केले आहे”.
अध्यक्षीय मनोगतात प्र.प्राचार्या डॉ. उज्वला भोर यांनी,महानुभाव संप्रदायातील साहित्याची ओळख विद्यार्थ्यांना करून दिली.तसेच महानुभाव संप्रदाय महाराष्ट्रात उदयास आला आणि मराठीत आद्य मराठी ग्रंथ ‘लीळाचरित्र’ लिहिला गेला. त्याचबरोबर महानुभाव संप्रदायाने विविध साहित्य निर्मितीही मराठी भाषेतून करून मराठी भाषेला समृध्द करण्याचे कार्य केले. वा विशेषाबरोबरच लोकभावनेचा, लोकभाषेचा पुरस्कार महानुभाव संप्रदायाने केला,हे त्यांचे मोठे सांस्कृतिक कार्य होते.असे विचार मांडले.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.डॉ. बाबासाहेब शेंडगे यांनी केले.या कार्यक्रमासाठी वाणिज्य विभागाचे प्रमुख प्रा.डॉ.अर्जुन भागवत,प्रा.डॉ. एन. एम चव्हाण,प्रा.डॉ.रंजना वर्दे प्रा.डॉ.देविदास रणधीर.प्रा.डॉ.चंद्रकांत चौधरी,प्रा.डॉ.बंडेराव तराळ यांच्यासह अनेक प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.या कार्यक्रमाचे आभार प्रा. रावसाहेब दहे यांनी मानले तर सूत्रसंचालन प्रा.डॉ.वैशाली सुपेकर यांनी केले.