
संपादक -राजेंद्र तासकर
महाराष्ट्र राज्याचे सहकारमहर्षी व संजीवनी उद्योग समुहाचे संस्थापक माजीमंत्री शंकरराव कोल्हे यांनी वयाच्या २१ व्या वर्षापासुन सामाजिक कार्याची सुरूवात करत त्याचा ठसा राज्य व राष्ट्रीय पातळीवर उमटविला,त्यांच्या जाण्याने राज्याची मोठी हानी झाली असुन शंकरराव कोल्हे यांनी आयूष्यभर आपल्या कार्य व्यासंगातुन जो विचार युवापिढीसमोर ठेवला आहे तो सर्वांनाच प्रेरणा देणारा आहे म्हणूनच त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, आदि विचारधारेची कार्यप्रणाली येथुनपुढच्या काळातही सुरू ठेवण्यात येणार असुन त्यासाठी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे विचारधारा ट्रस्टची नुकतीच स्थापना करण्यांत आल्याची माहिती जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांनी दिली.
ते म्हणाले की,स्व. शंकरराव कोल्हे यांनी परदेशात जाउन उच्च शिक्षण घेतले त्यातुन ते तेथेच उद्योजक होवु शकत होते पण ग्रामिण जनतेशी असलेली नाळ त्यांनी कायम ठेवत पुन्हा मायदेशी येवुन येथील शेतकरी व सर्वसामान्यांच्या प्रगतीत त्यांनी मोलाचे योगदान दिले.
त्यांनी वसंतदादा शुगर इन्स्टीटयूट पुणे,राज्य सहकारी साखर संघ मुंबई,नॅशनल हेवी पुणे,नॅशनल फेडरेशन दिल्ली, सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना, गोदावरी खोरे दूध संघ,कोपरगांव औद्योगिक वसाहत,साई संजीवनी सहकारी बॅक,संजीवनी सहकारी पतसंस्था,यशवंत कुक्कुट,संजीवनी ग्रामिण शिक्षण संस्था आदि संस्था स्थापन करून नावलौकिक वाढवला,ग्रामिण अर्थकारणासह शिक्षण, सहकाराचे जाळे मजबूत करण्याचा विशेष प्रयत्न केला आहे.,त्यांचे समाजकार्य दीपस्तंभाप्रमाणे उभे आहे., त्यातून इतरांना प्रेरणा मिळावी या उद्देशाने या विचारधारा ट्रस्टची कार्यप्रणाली आहे.
सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे यांनी स्वत:ला सामाजिक कार्यातुन सिध्द करत मिळालेल्या पदाला न्याय देवून त्याचा नांवलौकीक आम जनतेसमोर ठेवला आहे.पदापेक्षा त्यांनी सामाजिक कार्याला विशेष महत्व देत दीन दलित,उपेक्षीत, आदिवासी,मागासवर्गीय, अल्पसंख्यांक समाजाबरोबर बहुजनाच्या उध्दारासाठी केलेले कार्य आगामी युवा पिढीला प्रेरणादायी आहे.बदलत्या मुक्त अर्थव्यवस्थेत स्पर्धेला सामोरे जाउन विकसनशील राष्ट्राच्या प्रगतीत योगदान देण्यासाठी तळागाळातील माणसाची उंची वाढली पाहिजे.त्यातून त्याच्या प्रगतीचा मार्ग सापडला पाहिजे यासाठी शंकरराव कोल्हे यांनी कधीही तत्वाशी तडजोड केली नाही. गोर गरीबाच्या व शेतक-यांच्या मुला मुलींना व दर्जेदार शिक्षणाच्या सुविधा ग्रामिण भागातही मिळाल्या पाहिजे यासाठी उभे केलेले कार्य एक मैलाचा दगड आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि त्यांच्या सामाजिक कार्याच्या विचाराची जपवणूक व्हावी व त्याचा वसा अनंत काळासाठी अविरतपणे पुढच्या पिढीपर्यंत साकारला जावा,तसेच आर्थीकदृष्टया मागास असलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या संधी निर्माण करून देणे,त्याचप्रमाणे सामाजिक कार्यात योगदान असलेल्यांचा गौरव करणे,इतर सामाजिक कामे करणे या उद्देशाने त्यांच्या नावाने शंकरराव कोल्हे विचारधारा ट्रस्टची स्थापना करण्यात आली असल्याचे ते शेवटी म्हणाले.