
कोपरगाव – “भारतीय लोकशाहीचा आधारस्तंभ असलेल्या संविधानाचे महत्त्व जाणण्यासाठी आणि भारतीय संविधानातील मूलतत्त्वे, नागरिकांचे अधिकार, मूलभूत हक्क, कर्तव्य यांची जाणीव ठेवण्यासाठी प्रत्येक नागरिकाने संविधानाचा अभ्यास करणे आवश्यक आहे”. असे प्रतिपादन अण्णासाहेब आवटे महाविद्यालय, मंचरचे माजी राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. विलास सदाफळ यांनी केले. ते श्री सद्गुरू गंगागिरी महाराज सायन्स गौतम आर्ट्स व संजीवनी कॉमर्स कॉलेज कोपरगाव मधील राज्यशास्त्र विभाग व सांस्कृतिक विभाग संयुक्त विद्यमाने आयोजित ७६ व्या संविधान दिन कार्यक्रमात बोलत होते.कार्यक्रमाचे अध्यक्षीय स्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव सरोदे यांनी भूषविले. प्रस्तुत प्रसंगी सर्व प्रथम उपस्थितांनी एकत्रितपणे भारतीय संविधान उद्देशिकेचे प्रतिज्ञापूर्वक वाचन करून लोकशाही, समानता आणि बंधुता या मूल्यांची जपवणूक करण्याची शपथ घेतली.
यावेळी ते म्हणाले की, “माणसाने कर्तव्य पार पाडत असताना संविधानाचा विसर पडू नये. सर्वांनी आपल्या मूलभूत हक्काबरोबरच आपली कर्तव्यांची जबाबदारीची जाणीव ठेवायला हवी. भारतीय संविधान हा केवळ ग्रंथ नाही तर तो देशाच्या भविष्याच्या आरसा आहे. त्यामुळे आजच्या विद्यार्थ्यांनी संविधानातील मूल्यांचा अभ्यास करून एक जबाबदार नागरिक बनणे गरजेचे आहे.” असे स्पष्ट केले.
अध्यक्षीय मनोगतात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव सरोदे यांनी,“२६ नोव्हेंबर रोजी झालेल्या संसदेवरील आतंकवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांसाठी श्रद्धांजली अर्पण करत भारतीय संविधान हे जगातले सर्वाधिक मोठे संविधान असल्याचे सांगितले. देशात सुरक्षितता व शांतता स्थापित करणे व त्याचबरोबर देशाला योग्य दिशा देण्याचे काम संविधान करत असते.आजच्या जागतिकीकरणाच्या काळात संविधानाची मुल्ये पायदळी तुडविले जातात. प्रत्येक नागरिकांनी संविधानाची जाणीव ठेवणे गरजेचे आहे कारण संविधान कसे लिहिले गेले? यामागे फार मोठे कष्ट परिश्रम आहे. संविधानातील आम्ही भारतीय लोक या शब्दावरूनच संविधानाची प्रगल्भता लक्षात येते. जनतेचे श्रेष्ठत्व निर्माण करायचे असेल तर देशाचे सार्वभौमत्व टिकून ठेवण्याची जबाबदारी सर्व नागरिकांची आहे.” असे सांगितले .
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा. तानसेन रणदिवे यांनी केले. या कार्यक्रमास विज्ञान विभागाचे उपप्राचार्य डॉ. घनश्याम भागवत, वाणिज्य विभाग प्रमुख व उपप्राचार्य डॉ. अर्जुन भागवत, सांस्कृतिक विभागप्रमुख डॉ. संतोष पवार, श्री. संदीप शिंदे यांसह महाविद्यालयातील वरिष्ठ आणि कनिष्ठ विभागातील सर्व प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी आणि महाविद्यालयातील विद्यार्थी- विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. भागवत देवकाते यांनी केले. तर आभार कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य श्री.संजय शिंदे यांनी मानले.