Homeकोपरगावआत्मा मालिक मध्ये राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेचा महासंग्रामास सुरुवात

आत्मा मालिक मध्ये राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेचा महासंग्रामास सुरुवात

डॉ.सुजय विखे यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन

कोपरगाव :- क्रीडा व युवक सेवा संचलनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, अहिल्यानगर व आत्मा मलिक शैक्षणिक व क्रीडा संकुल कोकमठाण यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘६९ व्या राष्ट्रीय शालेय १७ वर्षाखालील मुलींची कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन’ माजी खासदार डॉ.सुजय विखे यांच्या हस्ते क्रीडा ज्योत प्रज्वलित करून व अर्जुन पुरस्कार विजेते पोलीस उपआयुक्त पंकज शिरसाट तसेच साई संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्या उपस्थितीत मोठ्या जल्लोषात पार पडले.

या स्पर्धेसाठी देशभरातून ३३ संघांनी सहभाग नोंदविला असून २८ डिसेंबर पर्यंत या स्पर्धा पार पडणार आहेत यावेळी विद्यार्थिनींनी पारंपारिक औक्षण करून मान्यवरांचे स्वागत केले आयोजक संस्थेच्या वतीने त्यांच्या यथोचित सन्मान करण्यात आला. त्यानंतर मशाल फेरीद्वारे स्पर्धेचे अधिकृत सुरुवात करण्यात आली व उद्घाटन सोहळ्यात या ३३ संघानी अहिल्यानगरच्या पोलीस बँडच्या तालावर सुंदर क्रीडा संचलन करत पाहुण्यांना मानवंदना दिली. आत्मा मालिकच्या विद्यार्थ्यांनी सुंदर नृत्यविष्कार सादर करून पाहुण्यांची व उपस्थिततांची मने जिंकली.

महाराष्ट्र संघाची कर्णधार कु.आरती खांडेकर हिने खेळाडूंना शपथ दिली तसेच या प्रसंगी आत्मा मलिक एनडीए अकॅडमीची विद्यार्थिनी कु.कावेरी घोलप व कु.संजीवनी मोगरे यांची भारतीय वायुसेनेत निवड झाल्या त्याबद्दल त्यांचे कुटुंबीयां समवेत प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.

डॉ. विखे पाटील म्हणाले की, खेळातून संघभावना, परस्पर सन्मान, पराभव स्वीकारण्याची मानसिकता आणि विजय संयमाने पचवण्याची शिकवण मिळते. राष्ट्रीय स्तरावर खेळण्याची संधी मिळणे हे प्रत्येक विद्यार्थिनीसाठी अभिमानाची बाब असून, या संधीचे सोने करून दाखवावे, असे आवाहन त्यांनी केले. साईबाबांच्या पावन भूमीत आलेल्या सर्व खेळाडूंचे स्वागत करताना,अशा राष्ट्रीय स्पर्धांमधून देशाला भविष्यातील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू मिळतील, असा विश्वास व्यक्त केला. महाराष्ट्र राज्य क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील असून, खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी शासन सदैव त्यांच्या पाठीशी उभे राहील, स्पर्धेच्या उत्कृष्ट आयोजनाबद्दल जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, अहिल्यानगर व आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुल यांचे अभिनंदन केले.

पोलीस उपआयुक्त पंकज शिरसाठ म्हणाले की, कबड्डी हा केवळ शारीरिक ताकतीचा खेळ नसून तो शिस्त संयम आणि संघ भावनेचा खेळ आहे. या स्पर्धेत खेळताना विजयाबरोबरच खेळातील प्रामाणिकपणा मेहनत आणि खिलाडू वृत्ती महत्त्वाची आहे असे यावेळी त्यांनी सांगितले.

आत्मा मालिक ध्यान योग मिशनचे अध्यक्ष संत परमानंद महाराज म्हटले की, ध्यान ही फक्त साधना नसून ती विद्यार्थ्यांच्या अंतकरणातील शक्ती जागृत करणारे प्रक्रिया आहे. ध्यानामुळे एकाग्रता संयम व आत्मविश्वास वाढतो जो खेळाडूसाठी अत्यंत आवश्यक आहे. खेळ हा केवळ शरीराचा व्यायाम नसून आत्मशक्तीचा अविष्कार आहे. ध्यान शिस्त आणि सात्विक जीवनशैली यांच्या माध्यमातून भारतातील खेळाडू जागतिक स्तरावर देशाचे नाव उज्वल करतील असे महाराजांनी नमूद केले.

यावेळी व्यासपीठावर आत्मा मलिक ध्यानयोग मिशनचे अध्यक्ष, संत परमानंद महाराज व संत मांदियाळी, विश्वात्मक जंगली महाराज, आश्रम ट्रस्टचे अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी, उपाध्यक्ष बाळासाहेब गोर्डे, सरचिटणीस हनुमंतराव भोंगळे, कोषाध्यक्ष विठ्ठलराव होन, विश्वस्त प्रकाश गिरमे, प्रभाकर जमधडे, जिल्हा क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरंगे, जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयाचे सर्व क्रीडाधिकारी व क्रीडा मार्गदर्शक उपस्थित होते. पंचप्रमुख बळीराम सातपुते, जिल्हा कबड्डी संघटना सहसचिव विजय मिस्कीन, आश्रमचे वरिष्ठ व्यवस्थापक हिरामण कोल्हे, शालेय व्यवस्थापक सुधाकर मलिक, वस्तीगृह व्यवस्थापक साईनाथ वर्पे, मिरा पटेल, कबड्डी फेडरेशनचे स्पर्धा निरीक्षक पंकज त्रिवेदी, सर्व प्राचार्य आदी मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरंगे यांनी केले तर सूत्रसंचालन निरंजन डांगे, अजय देसाई यांनी केले पाहुण्यांचे आभार क्रीडा अधिकारी प्रियंका खिंडरे यांनी मांडले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!