
ए.आय- साहित्य: संधी आणि आव्हाने या विषयावर एकदिवसीय आंतरराष्ट्रीय ई-परिषद उत्साहात संपन्न
कोपरगाव: “ए.आयच्या वाढत्या प्रभावाच्या पार्श्वभूमीवर भाषेचा शैक्षणिक, प्रशासकीय आणि दैनंदिन व्यवहारातील वापर अधिक व्यापक करण्याची गरज अधोरेखित करण्यात आली. कोणतीही प्रादेशिक भाषा ही केवळ बोलीभाषा नसून ज्ञानभाषा म्हणून सक्षम आहे. विज्ञान, तंत्रज्ञान, संशोधन आणि शिक्षण क्षेत्रात भाषेचा प्रभावी वापर होणे आवश्यक असून ए.आयमध्ये मराठी भाषेचा समावेश वाढविणे काळाची गरज आहे, असे मत कवी, भाष्यकार, नेदरलँड (USA) येथील वैश्विक आर्ट एन्व्हायर्नमेंटचे संस्थापक मा. भास्कर हांडे यांनी केले. ते रयत शिक्षण संस्थेच्या श्री सद्गुरू गंगागीर महाराज सायन्स, गौतम आर्ट्स आणि संजीवनी कॉमर्स महाविद्यालय, कोपरगाव (जि. अहिल्यानगर) येथील इंग्रजी, हिंदी व मराठी विभाग तसेच अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष (IQAC) यांच्या संयुक्त विद्यमाने “AI–Opportunities and Challenges in Literature” (साहित्यातील एआय – संधी आणि आव्हाने) या विषयावर एकदिवसीय आंतरराष्ट्रीय ई-परिषदेत बोलत होते. “प्रत्येकाने भाषेला ज्ञानाची भाषा म्हणून स्वीकारले पाहिजे,” असा ठाम संदेश यावेळी देण्यात आला.
आंतरराष्ट्रीय ई-परिषदेचे प्रास्ताविक व स्वागतपर भाषण प्राचार्य प्रा. डॉ. माधव सरोदे यांनी केले. प्रमुख पाहुणे म्हणून रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष मा. अॅड. भगीरथ शिंदे यांनी दूरदृष्यप्रणालीद्वारे शुभेच्छा दिल्या. उद्घाटन सत्राच्या अध्यक्षस्थानी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे येथील मराठी विभाग प्रमुख डॉ. तुकाराम रोंगटे यांनी साहित्यक्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वाढत्या प्रभावाचा वेध घेत, तिच्या संधी व आव्हानांवर चर्चा करताना ए.आय. ही दुधारी तलवार आहे, असे स्पष्ट केले.
न्यू अलीपूर कॉलेज, कोलकाता येथील प्राचार्य मा. डॉ. जयदीप सारंगी यांनी ‘साहित्यातील कृत्रिम बुद्धिमत्ता’ या विषयावर, विक्रमशिला हिंदी विद्यापीठ, भागलपूर (भारत) येथील कुलगुरू मा. अॅड. डॉ. गोपाल नारसन यांनी विविध सत्रांमध्ये ए.आयमुळे साहित्य निर्मिती, समीक्षा, भाषांतर आणि अध्यापन पद्धतींमध्ये होत असलेल्या बदलांवर सखोल चर्चा केली.
संशोधन पेपर सादरीकरणसत्रामध्ये एकूण ७० पेपर अभ्यासकांपैकी २३ संशोधक अभ्यासकांनी आपले अभ्यासपूर्ण पेपर केले. तर या चर्चासत्रासाठी १६९ अभ्यासकांनी सहभाग नोंदविला. सदर सत्राचे अध्यक्षस्थान पंढरपूर महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख डॉ. रमेश शिंदे यांनी भुषविले. अध्यक्षीय मनोगतात संपूर्ण पेपर वाचकांच्या पेपरचा संक्षिप्त आढावा घेत,“ए.आय च्या लिखाणात उत्तम नक्कल असते”,असे स्पष्ट सांगितले.
समारोप सत्राचे प्रमुख पाहुणे म्हणून आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, नारायणगाव प्राचार्य डॉ. आनंद कुलकर्णी यांनी,“क्रिएटिव्ह रायटिंग किती परिणाम कारक आहे हे भविष्यात बघण्यासारखे आहे असे सांगून ए आय चा साहित्यावर मोठा परिणाम होणार आहे.असे सांगून मानवी संवेदनशीलता ए. आय. विकसित करू शकत नाही.” असे स्पष्ट केले. अध्यक्षीय मनोगतात धनंजयराव गाडगीळ महाविद्यालयाचे इंग्लिश विभाग प्रमुख प्रा. डॉ. गणेश जाधव यांनी,“आभासी वास्तव आणि खरे वास्तव यातील भेद माणूस विसरतो आहे तसेच एआय मानवाला अपंग बनवतो आहे.”असे स्पष्ट केले. संपूर्ण चर्चासत्राचा मागोवा मराठी विभाग प्रमुख डॉ. संतोष पवार यांनी घेतला. या चर्चासत्राचे आभार प्रा. डॉ. उज्ज्वला भोर यांनी मानले. तर सूत्रसंचालन डॉ माधव यशवंत, डॉ. भागवत देवकाते, प्रा.मनोज आवारे यांनी केले, तंत्रसहाय्य म्हणून प्रा. सुनील काकडे, श्री. गणेश जगताप यांनी मोलाची भूमिका बजावली. तसेच चर्चासत्राच्या यशस्वीतेसाठी कला शाखेचे उपप्राचार्य डॉ. बंडेराव तऱ्हाळ, वाणिज्य शाखेचे उपप्राचार्य डॉ. अर्जुन भागवत, विज्ञान शाखेचे उपप्राचार्य डॉ. घनश्याम भगत आणि कार्यालय अधीक्षक श्री. सुनील गोसावी यांनी सहकार्य केले.
संपूर्ण परिषद दूरदृश्यप्रणालीच्या माध्यमातून यशस्वीरीत्या पार पडली. या परिषदेत देश-विदेशातील प्राध्यापक, संशोधक व विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.