
कोपरगाव : – बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण ) अधिनियमानुसार महाराष्ट्र शासनाच्या 2014 च्या परिपत्रकानुसार प्रत्येक प्रभागात बाल संरक्षण समिती स्थापन करणे हे बंधनकारक असल्याने या कायदेशीर बाबींचा विचार करून या समित्या लवकरात लवकर स्थापन कराव्या अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते डॉ अशोक गावित्रे यांनी आपल्या निवेदनाद्वारे कोपरगाव नगरपालिकेचे नगराध्यक्ष मा. श्री पराग संधान साहेब यांच्याकडे केली आहे.
निवेदनात पुढे ते म्हणाले की, दिवसेंदिवस बालविवाह, बालमजुरी, अमली पदार्थाचे सेवन, लैंगिक अत्याचार इत्यादीचे प्रमाण वाढत चालले असून मागील काही वर्षात कोपरगाव शहरांमध्ये अनेक अल्पवयीन मुलींनी आत्महत्या देखील केलेल्या आहेत या आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी या समितीचा निश्चितच उपयोग होईल असे त्यांनी यावेळी म्हटले आहे.
या समितीचा अध्यक्ष हा ज्या – त्या प्रभागातील नगरसेवक असून अंगणवाडी सेविका या सदस्य सचिव म्हणून काम पाहतात तसेच एक अठरा वर्षे वयाची मुलगी व एक 21 वर्षाचा मुलगा यांचा सहभाग या समितीमध्ये असतो तसेच डॉक्टर, वकील, शाळेचे मुख्याध्यापक, पोलीस अधिकारी, स्वयंसेवी संस्थेचे प्रतिनिधी यांचाही या समितीत सहभाग करून घेता येतो.
कोपरगाव तालुक्यातील सर्व गावांमध्ये ग्राम बाल संरक्षण समिती ची स्थापना करण्यात आली असून सर्व ग्रामसेवकांची व अंगणवाडी सेविकांची कार्यशाळा देखील डॉ अशोक गावित्रे यांनी घेतलेली आहे यामुळे या समित्या लवकरात लवकर स्थापन कराव्या अशी मागणी डॉक्टर अशोक गावित्रे यांनी कोपरगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी श्री सुहास जगताप साहेब तसेच नगराध्यक्ष श्री पराग संधान व महिला बालकल्याण समितीच्या सभापती सविता कैलास मंजुळ यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.