
कोपरगाव : – माध्यमिक शिक्षक सोसायटी परिवर्तन मंडळाच्या ताब्यात आल्यानंतर एकही योजना बंद केली नाही. सभासद कर्जाचा व्याजदर ७ टक्केच ठेवला. आगामी काळात संस्थेच्या ठेवी वाढवाव्या लागतील. संस्था स्वभांडवली करण्याचा संचालक मंडळाचा प्रयत्न राहील, असे प्रतिपादन माध्यमिक शिक्षक सोसायटीचे चेअरमन आप्पासाहेब शिंदे यांनी केले.
राहाता व कोपरगाव तालुक्यातील संस्थेच्या सेवानिवृत्त सभासदांचा कृतज्ञता सोहळा व सभासदांच्या गुणवंत पाल्यांचा पारितोषिक समारंभ आयोजित करण्यात आला होता. त्या प्रसंगी सभासदांसमोर श्री. शिंदे बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. विलास आवारी हे होते.

या सोहळ्यास गणेश कारखान्याचे संचालक नानासाहेब नळे, संस्थेचे व्हा. चेअरमन अर्जुन वाळके, माजी संचालक बाळासाहेब सोनवणे, जेष्ठ संचालक सुनील दानवे, महेंद्र हिंगे, अतुल कोताडे, संभाजी गाडे, साहेबराव रकटे, उमेश गुंजाळ, किशोर धुमाळ, बाजीराव अनभुले, सुधीर कानवडे, सुरज घाटविसावे, प्रशांत होन, कल्याण ठोंबरे, सचिन जाधव, भाऊसाहेब धनवटे, गोरख निर्मळ, संजय तुरकणे, आदीसह राहाता व कोपरगाव तालुक्यातील सभासद, विद्यार्थी उपस्थित होते.
माध्यमिक शिक्षक सोसायटीचे चेअरमन आप्पासाहेब शिंदे म्हणाले, माध्यमिक शिक्षक सोसायटीचे कर्जवाटप 978 कोटी 64 लाख इतके आहे. ठेवी सुमारे 709 कोटी रुपये इतक्या आहेत. सभासदांना दिल्या जाणाऱ्या कर्जाचा व्याजदर 7 टक्के इतका आहे. तर जिल्हा बँकेकडून संस्थेला 12.50 टक्के दराने पतपुरवठा होतो. ही तफावत असली तरीही व्याजदर संचालक मंडळाने 7 टक्केच ठेवला आहे. सभासद आणि संस्थेचे हित जोपासायचे आहे. यासाठी संस्थेकडे ठेवींचा ओघ वाढवावा लागेल. संस्था स्वभांडवली करण्याचा संचालक मंडळाचा प्रयत्न आहे. असे झाले तर सिसी ची गरज पडणार नाही. संस्था चांगलीच चालेल. सभासद, संस्थेच्या हिताचे होईल. सभासदांनी ठेवी वाढवाव्या.
अहिल्यानगर येथे महापालिकेने भूखंड उपलब्ध करुन दिला तर त्या ठिकाणी मुलींसाठी हॉस्टेल उभारण्याचा संस्थेचा प्रयत्न आहे. राहाता व कोपरगाव तालुक्यातील सभासदांनी परिवर्तन मंडळाला चांगली साथ दिली. म्हणूनच सत्ता मिळाली. राहाता तालुक्याला न्याय देऊ. पूर्वी नगरहून दोन/तीन संचालक यायचे, आमच्या संचालक मंडळात एकमत आहे. म्हणूनच सर्वजण या कार्यक्रमाला आले. संस्थेत एकाधिकार शाही नाही. कोणतीही शाखा बंद करणार नाही. निवडणुकीत दिलेले आश्वासन पाळू, व्याजदर वाढविणार नसल्याचा पुनरुच्चार चेअरमन शिंदे यांनी केला.
यावेळी बोलतांना जेष्ठ संचालक सुनील दानवे म्हणाले, संचालक मंडळाने चेअरमन आप्पासाहेब शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सभासद हिताचेच निर्णय घेतले आहेत. 2021 – 22 मध्ये व्याजदर 7 टक्के इतका करण्यात आला होता. तेव्हा जिल्हा बँक 10.35 टक्के दराने पतपुरवठा करत होती. आज पतपुरवठ्याचा दर 12.5 टक्के झाला आहे. 3.35 ते 5.50 टक्के दुरावा निर्माण झाला आहे. परंतु संचालक मंडळाने 7 टक्के सभासद कर्जाचा व्याजदर ठेवला. तसेच ठेवीवरील व्याजदर 6.5 वरून 7 टक्के केल्याचे दानवे म्हणाले.
प्रमुख अतिथी म्हणून बोलतांना गणेश कारखान्याचे संचालक नानासाहेब नळे यांनी संस्थेच्या कारभाराचे कौतुक केले. अती अल्पदरात कर्ज माध्यमिक सोसायटी कर्ज देते. हे सभासदांच्या हिताचे आहे.
प्रास्तविक संचालक अतुल कोताडे यांनी केले. ते म्हणाले, हे संचालक मंडळ सभासद हिताबरोबरच संस्थेचा हित जोपासणारे आहे. संस्था मोठी झाली पाहिजे वाढली पाहिजे, त्यामुळे भविष्यात काळाप्रमाणे चालायचे असल्यास काही कडू गोड निर्णय घ्यावे लागतील त्यासाठी सभासदांनी साथ द्यावी. कोणतीही आर्थिक संस्था भुलथापांवर चालत नाही किंवा खोट्या आश्वासनांवर चालत नाही तर ती आर्थिक शिस्त नियम व बायलॉज प्रमाणे चालते. सभासद व संस्था रथाची दोन चाकं आहेत व संचालक मंडळ सारथी आहे.
यावेळी प्रा. डॉ. विलास आवारी, संचालक महेंद्र हिंगे, बाजीराव अनभुले आदींची भाषणे झाली. सूत्रसंचालन प्राध्यापक दीपक बुधवंत यांनी केले. आभार श्री. देसाई यांनी मानले.
या प्रसंगी श्री. जगताप, श्री. डांगे, श्री. हाडोळे, बच्छाव, होन, बाळासाहेब विखे, बाबासाहेब गायकवाड, दिलीप नळे, शिवाजी गमे, राहाता शाखाधिकारी गोरक्ष शेजवळ, कोपरगाव शाखाधिकारी नितीन होन, संकेत गमे, वैशाली डांगे आदींसह सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.