
कोपरगाव : समता इंटरनॅशनल स्कूल आणि समता Tiny Tots यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शैक्षणिक वर्ष २०२५–२६ चा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा ‘अनोखी दुनिया – Where Imagination Becomes Reality’ या संकल्पनेतर्गत अत्यंत दिमाखात आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला साकार रूप देणारा हा बहारदार सोहळा उपस्थितांसाठी अविस्मरणीय ठरला.
कार्यक्रमासाठी कुलस्वामिनी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन बाळासाहेब आढाव प्रमुख पाहुणे तर शाळेचे संस्थापक ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच डॉ. अमोल अजमेरे यांच्या प्रमुख उपस्थितीसह संस्थेच्या कार्यकारी विश्वस्त सौ. स्वाती कोयटे, शालेय व्यवस्थापन समिती सदस्य संदीप कोयटे आणि पालक वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रसंगी प्रमुख पाहुणे बाळासाहेब आढाव यांनी विद्यार्थ्यांना ध्येयवादी वृत्ती, चिकाटी आणि परिश्रम यांच्या जोरावर उज्ज्वल भवितव्य घडविण्याचा प्रेरणादायी संदेश दिला. डॉ. अमोल अजमेरे यांनी ‘स्वप्नांना आकाश द्या, प्रयत्नांना पंख द्या आणि जिद्दीला दिशा द्या,’ असा प्रेरणामंत्र देत वातावरणात नवचैतन्य निर्माण केले.
अध्यक्षीय मनोगतातून संस्थापक काका कोयटे यांनी मूल्याधिष्ठित शिक्षणाचा ध्यास अधोरेखित करत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळा कटिबद्ध असल्याचे सांगितले. कार्यकारी विश्वस्त सौ. स्वाती कोयटे यांनी शिक्षणासोबत संस्कार, शिस्त आणि नेतृत्व गुण जोपासण्याचे महत्त्व मनोगतातून स्पष्ट केले.
मंगलमय वातावरणात गणेश वंदना व दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्राचार्य समीर अत्तार यांनी स्वागतपर भाषणातून कार्यक्रमामागील संकल्पना स्पष्ट केली. विभाग प्रमुख राणी शेळके यांनी वार्षिक अहवाल सादर करत शाळेची शैक्षणिक गुणवत्ता, क्रीडा प्रगती आणि सांस्कृतिक यश यांची प्रभावी मांडणी केली.
यानंतर पार पडलेल्या बक्षीस वितरण समारंभात शैक्षणिक, क्रीडा व विविध शालेय तसेच सहशालेय स्पर्धांमध्ये उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. टाळ्यांच्या कडकडाटात विद्यार्थ्यांच्या यशाचा गौरव होत असताना सभागृहात अभिमानाचे वातावरण निर्माण झाले.
‘अनोखी दुनिया’ या संकल्पनेला साजेशा सांस्कृतिक कार्यक्रमांनी रंगमंच उजळून निघाला. विद्यार्थ्यांच्या नृत्याविष्कारांनी उपस्थितांची मने जिंकली. तालबद्ध पावले, नेटक्या हालचाली, भावपूर्ण हावभाव आणि रंगीबेरंगी वेशभूषेमुळे प्रत्येक सादरीकरण प्रभावी ठरले. पारंपरिक व आधुनिक नृत्यरचनांच्या संगमातून कल्पनाशक्तीचा मोहक आविष्कार साकारला गेला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्णव कुलकर्णी, अर्णव आढाव, अनन्या शेळके, पार्थ मोरे, ईशान कोयटे, सई हराळे तसेच हिमांशू वाघ या विद्यार्थ्यांनी ओघवत्या शैलीत केले. सर्व शिक्षकवृंद व कर्मचाऱ्यांच्या नियोजनबद्ध प्रयत्नांमुळे हा सोहळा यशस्वीरीत्या पार पडला. ‘अनोखी दुनिया’ या संकल्पनेने विद्यार्थ्यांच्या कल्पनांना नवे पंख देत उपस्थितांच्या मनावर आनंद, अभिमान आणि प्रेरणेचा ठसा उमटविला.