
कोपरगाव :- “रिसर्च आणि इनोव्हेशन हे केवळ प्रयोगशाळेतच निर्माण होत नाही. एखादा छोटासा विचारही संशोधनाचा सुंदर निष्कर्ष ठरू शकतो. स्थानिक समस्या शोधून त्यावर परिणामकारक उपाययोजना केल्यास संशोधनात मोलाची भर घालता येते. संशोधनामध्ये उपयोजकता अत्यंत महत्त्वाची असून, अविष्कार संशोधन स्पर्धेसाठी संशोधनाच्या विषयाचे आकर्षक व प्रभावी शीर्षक असणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन साईट्रेन लाइफ सायन्स प्रायव्हेट लिमिटेड, अहिल्यानगरचे मॅनेजिंग डायरेक्टर डॉ. विकास कांडेकर यांनी केले.
रयत शिक्षण संस्थेच्या श्री सद्गुरू गंगागीर महाराज सायन्स, गौतम आर्ट्स अँड संजीवनी कॉमर्स महाविद्यालय, कोपरगाव येथे आयोजित अविष्कार संशोधन कार्यशाळेत ते मार्गदर्शन करत होते.
अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ. माधव सरोदे यांनी, “प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा वाढत असल्याचे सांगून, विद्यार्थ्यांनी सामाजिक समस्या ओळखून त्यावर संशोधन करावे, तसेच संशोधनाची निष्पत्ती व उद्दिष्टे स्पष्ट असावीत”, असे आवाहन केले. अविष्कार संशोधन स्पर्धेत सहभागी होताना सामाजिक समस्या, संशोधन पद्धती, उद्दिष्टे, निष्पत्ती, विश्लेषण आणि कार्यक्षमता यांचा सखोल विचार करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
राज्यस्तरीय अविष्कार संशोधन स्पर्धा २०२५-२६ मध्ये सहभागी विद्यार्थिनी कु. नीलम मगर हिने आपले अनुभव व्यक्त केले.
कार्यशाळेचे प्रास्ताविक महाविद्यालयाच्या संशोधन समितीचे चेअरमन डॉ. विलास गाडे यांनी केले. यावेळी व्यासपीठावर श्री. वैभव डहाळे, वाणिज्य विभागाचे उपप्राचार्य डॉ. अर्जुन भागवत, विज्ञान शाखेचे उपप्राचार्य डॉ. घनश्याम भगत यांसह कार्यशाळेस महाविद्यालयातील अविष्कार संशोधन स्पर्धेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. प्रियंका पवार व प्रा. अक्षदा कदम यांनी केले. आभार अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ. निलेश मालपुरे यांनी मानले. कार्यशाळेसाठी तंत्रसहाय्यक म्हणून श्री. गणेश जगताप यांनी काम पाहिले, तर छायाचित्रणाची जबाबदारी प्रा. सुनील काकडे व प्रा. सुरज हुसळे यांनी सांभाळली.