
नाशिक प्रतिनिधी – मराठा विद्या प्रसारक संस्था नाशिक च्या आदर्श शिशु विहार, अभिनव बाल विकास मंदिर व जनता विद्यालय, उत्तम नगर सिडको, नाशिक या तीनही शाळांमध्ये दरवर्षी करोडो रुपयांचा आर्थिक घोटाळा होत असल्याचे पालक संघर्ष समितीचे महेश पाटील यांनी प्रसिद्धीस दिलेल्या आपल्या निवेदनात म्हटले आहे.
प्रसिद्धी पत्रकात पुढे असे म्हटले आहे कि,अभिनव बाल विकास मंदिर हि १ ली ते ४ थी ची शाळा १००% अनुदानित आहे तसेच जनता विद्यालय ५ वी ते १० वी हि शाळा हि १००% अनुदानित आहे. तरीही अभिनव बाल विकास मंदिर या शाळेत प्रवेश मिळविण्यासाठी पालकांकडून २० ते २५ हजार रुपये डोनेशन घेतले जाते, प्रत्येक वर्षी ७५०० रुपये बेकायदेशीर फी आकारली जाते. तसेच जनता विद्यालय हि याच संस्थेची शाळा असून ४ थी पास झालेल्या विद्यार्थ्यांना ५ वी मध्ये प्रवेश घेण्यासाठी १०२०० रुपयांचे डोनेशन ची मागणी केली जात आहे, तसेच दर वर्षी १००० ते १५०० रुपये बेकायदेशीर पणे फी आकारली जात आहे. आदर्श शिशु विहार हि विना अनुदानित शाळा आहे या शाळेची फी ४००० रुपये असतांना शाळा प्रशासन यांनी आमदार सीमा हिरे यांची शाळा व्यवस्थापन समितीवर बेकायदेशीरपणे नियुक्ती करून पालकांना काही हि न सांगता १५०० रुपयांची बेकायदेशीरपणे फी वाढ करून पालकांवर ५५०० रुपये बेकायदेशीरपणे फी लादण्यात आली, शिक्षण विभागाच्या जी आर प्रमाणे शाळा व्यवस्थापन समितीचा अध्यक्ष हा पालकांमधुनच निवडायचा असतो, ज्या पालकांनी बेकायदेशीर डोनेशन व फ़ी भरण्यास नकार दिला आहे त्या विद्यार्थ्याचे गुणपत्रके, दाखले प्रवेश शाळा या संस्था चालकांनी अडवून ठेवलेले आहेत. अशा प्रकारचे पालकांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी दि.१६ जून रोजी विद्यार्थ्यांसह पालक शिक्षणमंत्री यांच्या दालनासमोर न्याय मिळेपर्यंत शाळा भरवणार असल्याचे पालक संघर्ष समिती महेश पाटील यांनी म्हटले आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून विद्यार्थी विम्याच्या नावाने पालकांकडून २०० रुपये सक्तीचे घेऊन विद्यार्थ्यांचा अनेक वर्षांपासून विमा न काढता संस्थाचालक व शाळेच्या मुख्याध्यापकांनी आत्तापर्यत करोडो रुपयांचा आर्थिक अपहार केलेला असल्याचा आरोपही त्यांनी यामध्ये केला आहे.
या संधर्भात गेल्या २ वर्षांपासून हजारो पालकांनी एकत्र येऊन शाळेच्या आवारात, संस्थेच्या आवारात तसेच शिक्षण उपसंचालक यांच्या दालनात वेळोवेळी आंदोलने करून न्याय मागण्याचा प्रयत्न केला आहे, परतू पालकांचे आंदोलने पोलीस बाळाचा वापर करून चिरडून टाकण्यात आले, संस्थाचालक व शाळेचे मुख्याध्यापक यांनी काही गुंडांना तसेच स्थानिक राजकीय पुढाऱ्यांना सांगून पालकांवर दबाव आणला. शिक्षण विभागातील सर्व विभागांतील अधिकाऱ्यांना तसेच शिक्षणमंत्री यांना पालकांनी आत्तापर्यत शेकडो तक्रारी अर्ज पाठवले आहेत. तसेच शेकडो पालक एकत्र येऊन शिक्षण मंत्री यांना भेटून तक्रार देऊन जवळपास ३ महिने झालेत तरी सुद्धा अजून कुणीही या तक्रारींची दाखल घेतलेली नसल्याने आम्हाला नाइलाजास्तव हा निर्णय घेणे भाग पडले असल्याचे त्यांनी नमुद केले आहे.
संस्था व शाळा प्रशासन इतके मुजूर झाले आहेत कि ते पालकांना सांगतात या शाळेत मुलांना शिकवायचे असेल तर फी व डोनेशन भरावेच लागेल आमचे कुणी हि काही हि वाकडे करू शकत नाही. म्हणून शाळेच्या मुख्याध्यापक यांनी संस्था चालकांच्या सांगण्यावरून फी न भरणाऱ्या विद्यार्थ्यांचे गुणपत्रके अडवून ठेवलेली आहेत. दाखले अडवून ठेवलेली आहेत, तसेच पुढील वर्गात प्रवेश मिळणार नाहीत अशी धमकी दिली गेली असल्याची माहीती त्यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे. आणि म्हणूनच दिनांक १६/०६/२०२५ पासून शाळा सुरु होत आहेत. त्याच दिवसा पासून विद्यार्थ्यांना शिक्षणमंत्र्यांकडून न्याय मिळत नाही तो पर्यत शाळेतील शेकडो विद्यार्थी आपल्या शेकडो पालकांसह शिक्षणमंत्री यांच्या निवास्थाच्या बाहेर जाऊन बसणार आहेत. शिक्षणमंत्र्यांच्या निवास्थाना बाहेरच शेकडो विद्यार्थ्यांची अन्यायाविरुद्ध न्याय मागण्याची शाळा भरणार आहे. असा पवित्रा विद्यार्थी, पालक व पालक संघर्ष समितीने घेतला आहे.
पालकांच्या मागण्या –▪️अभिनव बाल विकास मंदिर व जनता विद्यालय या दोनही शाळा १००% अनुदानित असून मुलांना १० वी पर्यत मोफत शिक्षण मिळावे ;▪️ पालकांनी आजपर्यत भरलेली बेकायदेशीर फी व डोनेशन चे संपूर्ण पैसे पालकांना परत मिळावे ;▪️आदर्श शिशु विहार या विना अनुदानित शाळेची फी ३००० रुपये इतकीच असावी. पुढील ५ वर्ष शिक्षक पालक संघाची मान्यता न घेता पुढील फी वाढ करण्यात येऊ नये ; ▪️वरील तीनही शाळांमध्ये या पुढे प्रवेशावेळी डोनेशन न घेता मोफत प्रवेश देण्यात यावेत ;▪️शाळेने आत्ताच गणवेश बदल केलेला आहे पुढील ५ वर्ष पालक संघाच्या परवानगी शिवाय गणवेश बदल करण्यात येऊ नये ; ▪️वरील तीनही शाळांमध्ये बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाच्या हक्कानुसार शाळेने या पुढे विद्यार्थ्यांचे गुणपत्रके, दाखले तसेच पुढील वर्षाचे प्रवेश अडवून ठेऊ नयेत असे झाल्यास त्वरित शाळेची मान्यता रद्द करण्यात यावी, तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका व संस्थेचे संस्था चालक यांच्यावर शिक्षण विभागाने त्वरित गुन्हे दाखल करावेत ; ▪️गेल्या अनेक वर्षांपासून विमा फी च्या नावाने पालकांकडून दर वर्षी २०० रुपये गोळा करून गेल्या अनेक वर्षांपासून विद्यार्थ्यांचा विमा न काढता शाळा व संस्था चालकांनी करोडो रुपयांचा अपहार केलेला आहे. तरी शिक्षण विभागाने त्वरित चौकशी करून संस्था चालक व शाळेच्या मुख्याध्यापकांवर गुन्हे दाखल करावेत व पालकांना पैसे परत देण्याचे आदेश देण्यात यावेत ;▪️ गेल्या अनेक वर्षांपासून इमारत निधी या नावाने पालकांकडून दर वर्षी ७०० ते ९०० रुपयांची वसुली केली जाते गेल्या अनेक वर्षात इमारत निधी च्या नावाने करोडो रुपये जमा झाले आहेत शाळेचे कुठलेच काम झालेले नाही, यात करोडो रुपयांचा अपहार झाला आहे, तरी याची चौकशी करण्यात यावी. पालकांना त्यांचे पैसे परत मिळावेत ; ▪️शिक्षण विभागाची परवानगी नसतांना शाळा व संस्था चालक आपल्या नफेखोरीसाठी नवनीत प्रकाशनाची पुस्तके बळजबरीने शाळेतून खरेदी करण्याची सक्ती केली जाते, ६५० रुपयांची पुस्तके २००० ते २२०० रुपयात पालकांना विकली जातात. तरी या पुढे शालेय अभ्यास क्रमाव्यातिरिक्त इतर बाहेरील पुस्तके पालकांना घेण्यास भाग पाडू नये. व शाळेत पुस्तके विक्री बंद करावी ;▪️ बसची बेकायदेशीर पणे वाढवलेली फी रद्द करण्यात यावी व नियमाप्रमाणे फक्त १० महिन्यानाचीच फी पालकांकडून घेण्यात यावी. बसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे,जीपीएस यंत्रणा, अग्नि प्रतीरोधक यंत्रणा तसेच प्यानिक बटण अशी सर्व यंत्रणा बसवण्यात याव्यात ; ▪️शाळेच्या मुख्याद्यापिका ज्योती पवार, मुख्याध्यापक ठाकरे, क्लार्क काकळीज यांनी संस्था चालकांच्या मदतीने शाळेत खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केलेला आहे, या मुळे वरील व्यक्तींची चौकशी करून दोष सिद्धी झाल्यास यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावेत. तसेच ताबडतोप वरील व्यक्तींना निलंबित करण्यात यावे. नवीन मुख्याध्यापक व क्लार्क यांची नियुक्ती करण्यात यावी यासह अन्य मागण्यां संबंधितांना दिलेल्या निवेदनात केल्या असल्याचे श्री महेश पाटील यांनी म्हटले आहे.
तरी पालक संघर्ष समितीच्या वतीने सर्व विद्यार्थी संघटना, पालक संघटना, सामाजिक संघटना,राजकीय पदाधिकारी यांना आवाहन करण्यात येत आहे कि आपण हजारो विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सहकार्य करावे. अशी त्यांनी शेवटी माफक अपेक्षा व्यक्त केली आहे.