
कोपरगांव.:- अंधश्रध्देपेक्षा ग्रंथावर विश्वास ठेवा, या भुतलावर अध्यात्म ग्रंथाचा साठा अलौकीक आहे तो नेहमी योग्य मार्ग दाखवतो, अंगात येणं हा भ्रम आहे, पाखंडी बुवाबाजी ढोंग आहे, मनगटात जोर ठेवा त्यातुन अवघड काम सोपं करता येतं. कलीयुगाच्या वाढत्या प्रभावामुळे सौभाग्याच लेणं टिकलीवर येवुन ठेपलं आहे, त्याचे मोठया* प्रमाणांत दुष्परिणाम होवु लागले आहे, आचरण नेहमी शुध्द ठेवा असे प्रतिपादन हरिद्वार येथील आचार्य शिरीष महाराज यांनी केले.
साईगांव पालखीच्यावतीने तहसिल कार्यालय कोपरगांवच्या संत ज्ञानेश्वर नगर मैदानावर नवनाथ भक्तीसार कथेचे आयोजन करण्यांत आले असुन त्याचे पाचवे पुष्प गुंफतांना ते बोलत होते.
प्रारंभी राष्ट्रसंत जनार्दन स्वामी आश्रमाचे मठाधिपती प. पू. रमेशगिरी महाराज यांनी कथा आयोजनाचे महत्व विषद करून नऊ नाथांच्या जन्माचे रहस्य सांगत आचार्य शिरीष महाराज यांनी सोप्या भाषेत नवनाथ कथासार सांगितल्याबददल त्यांचे कौतुक केले. कोपरगांवकर महापुण्यवान असुन त्यांना दरवर्षी अशा कथा-कीर्तनांतुन अध्यात्म बोधामृत मिळते असे ते म्हणाले. भागचंद माणिकचंद ठोळे विद्यालयात तिसरी मध्ये शिकणा-या यश महेश पाटणकर याने पेन्सीलच्या सहायांने प्रभु श्रीरामाचे चित्र रेखाटले तर श्री. मालपुरे यांनी हस्तलिखीत तुकारामगाथा लिहीली त्या ग्रंथाचे प्रकाशन आचार्य शिरीष महाराज यांच्या हस्ते करण्यांत आले. गोवर्धन गिरधारी गो माता सेवा ट्रस्टच्यावतीने हजारो गो मातांचे संगोपन सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
आचार्य शिरीष महाराज पुढे म्हणाले की, जो स्त्रि निंदा, लबाडी, मांस- मदिरा भक्षण, दुस-यांची फसवणुक करतो, खोटया भक्तीभावाने मिरवतो त्याचे आयुष्यात नेहमीच विघ्न येत असतात. आपण चांगलं तर जग चांगलं हा भाव नेहमी ठेवा. हल्लीची पिढी भगवंताकडे जाण्यासाठी विचारात मग्न होतात. बाप काय असतो हे नाथांकडुन शिकायला मिळतं. चिता आणि चिंता दोघही एकमेकांना सदैव जाळत असतात. भगवंत भेटण्यासाठी प्रत्येकाकडे भाव असावा लागतो. अशिक्षीत जनताच जास्त अंधश्रध्देला बळी पडतात. प्रत्येकाच्या आयुष्यात काय वाढून ठेवलं हे आपल्याला कधीच समजत नाही. पुर्वी मुलं-मुली लवकर उठत पण हल्ली भ्रमणध्वनीमुळे सुर्योदय होवुन तो अस्ताला कधी जातो हेच उमजत नाही.
या संपुर्ण कथेदरम्यान तबल्यासाठी निखील महाराज जाधव (मुक्ताईनगर), सिंथेसायझर प्रविण महाराज सातव (पारस शेगांव), गायन अंकुश महाराज कवळकार (पारस शेगांव), पॅडवादक प्रविण महाराज पारधे यांनी साथ संगत केली. नवनाथ कथेतील कलींगा नर्तीकेचे हुबेहुब पात्र लोककलावंत शुभम बोराडे याने सादर केले.